- मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार यादीतील घोळ
- निवडणूक आयोगाने नावे जाणून बुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचा आरोप
- मुंबई प्रतिनिधी दि २१ जून :
ॲड अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने पुरवणी मतदारयादीतून वगळल्याचा आरोप आज केला. तसेच निवडणूक आयोगाने हि नावे जाणून बुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचा आरोप करत ह्यामुळे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका या तत्वाला हरताळ फासला गेल्याचा आरोप केला.
याअनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने खासदार अनिल देसाई नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला एक निवेदन दिले. देसाई यांच्या सोबत परब आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना परब म्हणाले कि, पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. त्यांनी फॉर्म स्वीकारल्याच्या पोच पावत्या आमच्याकडे आहेत. ज्यावेळेस फॉर्म दिला जातो त्यावेळेस तो तपासूनच त्याची पोच पावती दिली जाते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पोच पावती येते. ज्यावेळेस पोच पावती दिली जात नाही त्यावेळेस तो फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. फॉर्म नाकारण्याची कारणे समजने हा अधिकार आहे. मात्र ह्यावेळेस फॉर्म स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. त्यामुळे ह्यामध्ये खुप मोठी गडबड आहे, असे परब म्हणाले.
हि नावे निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचाही आरोप परब यांनी केला. आम्ही नोंदवलेली नावे आली नसली तरी सत्ताधारी पक्षाने जी नावे दिलेली आहेत ती मात्र सर्वच्या सर्व पुरवणी मतदार यादीत आलेली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग हे जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या निर्देशाखाली काम करत आहे असे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप परब यांनी केला.
मतदान केंद्राचा घोळ
तसेच पदवीधर निवडणुकीकरिता मतदान केंद्राची निश्चिती करताना राजकीय पक्षांना विश्वासात न घेताच थेट अंतिम मतदान केंद्रांची यादी देण्यात आली. एकाच घरातील पतीस पश्चिमेकडील केंद्र तर पत्नीस पूर्वकडील मतदान केंद्र असा अक्षम्य घोळ घालण्यात आला असल्याचे परब म्हणाले.
तसेच गैरसोयीची आणि मुसळधार पावसात पाणी भरणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्रे ठेवण्यात आली असून त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता आहे. ह्याबाबत पक्षाचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. विलास पोतनीस यांनी देखील आपणाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अशी मतदान केंद्रे बदलून द्यावीत हि आमची मागणी आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मतदानाची सोय काय ?
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पदवीधर सरकारी कर्मचायांच्या मतदानासंदर्भात कोणती व्यवस्था करण्यात आली आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, अशीही मागणी केल्याचे परब म्हणाले.