ठाणे ,१७ जून :
विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया , ही येत्या १९ जून पासून सुरु होणार असून ११९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ७०१९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १०१५ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत तर पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झाले आहेत.
१९ जून पासून मुंब्रा याठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडीयम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपुर्ण काळजी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून १०० मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पुर्णपणे वॉटरप्रुफिंग करण्यात येणार आहे. जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.डी.एस.स्वामी यांनी दिली आहे.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून ॲम्ब्युलन्स असणार आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीने त्या शंकाच निरासन करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली आहे.