मुबंई प्रतिनिधी , १२ जुलै :
मुंबईतील वेगवेगळ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची कामे अपेक्षित गतीने पूर्ण न करणा-या विकासकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असून निकषांची पूर्तता करणा-या नवीन विकासकांना प्रकल्पांचे काम देण्यात आले असून लवकरच प्रकल्पांचे काम पूर्ण केल्या जाईल,असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुबंईतील १६६ झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्प प्रलंबित असल्याबाबत सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री सावे म्हणाले,
मुबंईत झोपडपट्टी पुनवर्सनाचे १६६ प्रकल्प हे विकासकाकडे अर्थसहाय्य उपलब्ध होत नसल्याने रखडलेले आहेत.शासनाने घेतलेल्या धोरणात्मक उपाय योजनानुसारच या योजनांमध्ये कलम १३(२) अन्वये विकासक बदलाण्याबाबत आजतयागत ९० प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून त्यानुसार योजनेसेंबधी पुढील परवानग्या जारी करण्यात येत आहेत. तसेच कामात कुचराई करत असलेल्या विकासकांची बॅंक खाती गोठवण्याचे आदेश संबंधित बॅकांना देण्यात आले असून जिल्हा निबंधकांना त्यांचे प्रकल्पांतील गाळे, सदनिका नोंदणी न करण्याबाबत कळवण्यात आले आहे.त्यामुळे सर्व झोपडपट्टी पूनवर्सन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी विकासकांना सूचित करण्यात आले असून त्यांची आर्थिक स्थिती तपासूनच त्यांना कामांची परवानगी देण्यात येत आहे. तसेच पुनवर्सन प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांसाठी पर्यायी सुविधांयुक्त निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची जबाबदारीही प्राधान्याने देणे विकासकांना बंधनकारकच असून यामध्ये हयगय करत असलेल्यांवर सक्त कारवाई केल्या जाईल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच रखडलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजना संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्याकरिता एकूण १२ झोपडपट्टी पुनवर्सन योजना असून त्या योजना पूर्ण करण्याकरिता अंदाजपत्रक अहवाल तयार करुन सदरच्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनांचे महामंडळे, प्राधिकरण,स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाटप करण्याकरिता शासन स्तरावर कार्यावाहीही सुरू असून उर्वरित प्रकल्प सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे, असेही मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.