पंढरपूर प्रतिनिधि , ४ जुलाई :
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल होतात. मागील काही वर्षांपासून आषाढी यात्रा सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून अगदी दोन महिने आधीपासूनच सुरु केली जाऊ लागल्याने भाविकांना पंढरीची वारी सुखाची झाल्याचा अनुभव येत आहे, असे म्हटले. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मागील काळात वारंवार पंढरपूरला भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करीत बैठका घेत नियोजनातील त्रुटी जाणून घेतल्या आहेत. त्याच बरोबर शहरात यात्रा कालावधीत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यावरील,फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत, अशा सुचना दिल्या होत्या.
मागील काही दिवसांत पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे,पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव हे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईच्या सूचना देताना दिसून आले आहेत.
आज गुरुवार दिनांक ४ जुलै रोजी शहरातील लोणार गल्ली परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत गजानन महाराज मठ परिसरासत नगर पालिकेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी जोरदार कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढून घेतले जात नसल्याने काही ठिकाणी पालिकेने जेसीबीचा वापर करून अतिक्रमणे हटविल्याचे दिसून आले.
पालिकेच्या या कारवाईमुळे वर्दळीचे रस्ते मात्र प्रशस्त होत असल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र अतिक्रमण हटविताना अनेक ठिकाणी वादावाद होताना दिसून आली असून शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त सोबत असल्याचे दिसून आले. पालिकेने यात्रेच्या तोंडावर आता अतिक्रमण हटिवले आहे, मात्र पुन्हा होऊ नये याचीही दक्षता घ्यावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.