Culture & Society

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’

Share

श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता

हिंदु जनजागृती समिती मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी होणार !

मुंबई ,दि २० जून :

 ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे, असे आम्ही मानतो; मात्र लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची इकोसिस्टम निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीच्या काळात जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० ते २०१५ या ६५ वर्षांच्या काळात हिंदूंची लोकसंख्या सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर त्या तुलनेत याच कालावधीत मुसलमानांची लोकसंख्या सुमारे ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ अनैसर्गिक म्हणावी लागेल; कारण भारतात अवैध बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी भारतीय नागरिकत्वाची ओळखपत्रे बनवून देणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या वर्षी तर निवडणुकांमध्येही बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत अशा काही घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या अवैध घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान करणे, हे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने मागील १३ वर्षांत भारताच्या जनसंख्येत काय पालट झाले, ते त्वरीत जनगणना करून जनतेच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे. तसेच CAA आणि NRC संपूर्ण भारतात त्वरीत लागू केले पाहिजे.

देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला तर, माता वैष्णोदेवीला जाणार्‍या भक्तांच्या बसवरील आतंकवादी हल्ल्यावरून समोर आले आहे की, काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्मूच्या दिशेने सरकत आहे. पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीसह राष्ट्रविरोधी आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी जोमाने सक्रीय झाल्या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अशा वेळी हिंदूंना जातीपातीच्या भांडणांत गुंतवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र आखले जात आहे; मात्र हिंदु राष्ट्राच्या मार्गात असे कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदूंच्या संघटनामुळे विरोधकांची षड्यंत्रे यशस्वी होणार नाहीत. जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे-अस्थिरता पाहता हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो. यासाठीच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी प्रदीप तेंडोलकर आणि ‘मराठा वॉरीअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष राहुल खैर हेही उपस्थित होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर पुढे म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय’, ‘हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

सर्वाेच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय म्हणाले, ‘कट्टरवादी मुसलमान भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा स्थितीत आज जनसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता आहे. भारत हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आताच पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल’. विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य प्रदीप तेंडोलकर म्हणाले, ‘आज केवळ हिंदूंची मंदिरेच शासनाच्या ताब्यात आहेत. भक्त्यांच्या ताब्यात हिंदूची मंदिरे आली पाहिजेत त्यासाठी आमचा लढा सुरु आहे. देश स्वतंत्र झाल्यावर भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हायला पाहिजे होते, ते साध्य होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहोत’. तर ‘मराठा वॉरीअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष राहुल खैर यावेळी म्हणाले ‘आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन कृती करण्याची मागणी आम्ही या हिंदू राष्ट्र अधिवेशनात देखील करत आहोत.’

 

Related posts

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर

editor

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव नगरीत भाविकांची मंदियाळी ; हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक

editor

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज २०२५’ संमेलन

editor

Leave a Comment