मुंबई प्रतिनिधी ,१४ जून :
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवूनही सार्वधिक यश मिळविणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे जागावाटप गुणवत्तेनुसार व्हावे, असा आग्रह धरला आहे. काँग्रेसने लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी ‘मेरीट’चा निकष पुढे केल्याने आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देत राज्यातील भाजपचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच आमचा उद्देश आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती. त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधानसभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते, असेही पटोले म्हणाले.
राज्यातील भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्वाचे आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने योजना करुन कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करुन लूट केली. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत पण त्यांच्या नावावर लूट मात्र सुरु आहे. बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. राज्याच्या जनतेला कर्जात बुडविण्याचे काम सुरु आहे. या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु, असेही नाना पटोले म्हणाले.