नवी दिल्ली, दि. १८ वृत्तसंस्था :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. या वर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता सरकार शेतकरी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकते. सरकार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम १२,००० रुपये करू शकते. सध्या या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देते.
पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सूत्रांचे म्हणणे आहे की सरकार आता शेतकऱ्यांना दरमहा १००० रुपयांची आर्थिक मदत देऊ शकते. २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा करू शकतात. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना १ लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी प्रधानमंत्री आवास योजना बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे. या ग्रामीण गृहनिर्माण योजनेचे वाटप वाढण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. १२ जून २०२४ पर्यंत या योजनेंतर्गत २.९४ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे.२.६२ कोटी घरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षी काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. झारखंड आणि दिल्लीत पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
महिलांसाठी मोठी योजना जाहीर करून त्यांचा विश्वास संपादन करता येईल, अशी सरकारला आशा आहे. सीएसडीएसच्या विश्लेषणानुसार यावेळी ३७ टक्के पुरुष आणि३६ टक्के महिलांनी भाजपला मतदान केल्याचे दिसून आले आहे. असे मानले जाते की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोफत स्वयंपाकाचा गॅस सारख्या सरकारी योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय ठरल्या होत्या.