मुंबई प्रतिनिधी , ३ जुलाई :
देशात राज्य दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र अकराव्या स्थानी असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीच्या आधारे केला. या आकडेवारीवरून चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सुधारणा करण्याची मागणी केली.
आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा संपल्यानंतर चव्हाण यांनी राज्याच्या दरडोई उत्पन्नाचा मुद्दा मांडला. विधिमंडळात नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पन्नात सहाव्या स्थानी असल्याचे आणि गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य अकराव्या स्थानी आहे. आपल्यापेक्षा छोटी असलेली दिल्ली, सिक्कीम, पॉण्डेचेरी, हरियाणा सारखी राज्ये पुढे गेली आहेत. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह नाही, असे चव्हाण यांनी सरकारला सुनावले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्या दाव्याचा प्रतिवाद केला. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या, सहाव्या स्थानी राहिले आहे. २०२०-२१ आणि २०२१-२०२२ मध्ये काहीच अंतर नव्हते. सकल राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या याआधारे दरडोई उत्पन्न काढले जाते. त्यामुळे दुष्काळच्या संकटात राज्य मागे जाते, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.