मुंबई प्रतिनिधी , ३ जुलाई :
केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेत कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका लक्षवेधीच्या उत्तरा दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना केला.
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते, अशी माहितीही मुंडे यांनी दिली.
पीएम किसान योजनेत राज्यातील ६५ हजार शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ईकेवायसीच्या कारणावरून वंचित राहिल्यासंदर्भात आ.अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी आज सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.या लक्षवेधीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत संबंधित ६५ हजार शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही मुंडे यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी याबाबत राज्य स्तरावरून तसेच केंद्र स्तरावरून विविध मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील,असेही मुंडे यांनी सांगितले.तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार असल्याचीही घोषणा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली.यावेळी आ.अभिमन्यू पवार यांसह प्रकाश आबिटकर,बच्चू कडू, श्वेता महाले आदी सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले.