Civics

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून : राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला

Share

मुंबई प्रतिनिधी ,१६ जून :

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या २७ जूनपासून सुरूवात होत असून १२ जुलैपर्यंतचा अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस कामकाज होणार असून त्यानंतरचे दोन आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २७ जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जूनरोजी राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. चौदाव्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून विविध समाजघटकांना खूष करण्यासाठी विविध सोयीसवलतींचा पाउस पडण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी शुक्रवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या पक्षाचे कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील सदस्य आहेत. मात्र यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. अजित पवारांसह हे दोघेही बैठकांसाठी पुण्यात होते. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाकडून आमदार सतिश चव्हाण सदस्य आहेत. मात्र तेही बैठकीला हजर नव्हते.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. या अधिवेशनात एप्रिल ते जुलै २०२४ या चार महिन्यांसाठी लेखानुदान मांडून ते मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आता या अधिवेशनात सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडी जोशात आहे. तर महायुतीला त्यातही भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मागील दोन निवडणुकीत मिळालेल्या कमी जागांमुळे भाजपकडून त्यांना सातत्याने हिणवले जात होते. परंतु आता या अधिवेशनात काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभेची निवडणूक एकदिलाने लढल्याने ही एकजूट अधिवेशनातही दिसण्याची शक्यता आहे.

Related posts

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले

editor

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णीपोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

editor

१२ हजार नावे पुरवणी मतदारयादीतून वगळली, ॲड अनिल परब यांचा आरोप

editor

Leave a Comment