मुंबई , ७ जुलाई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार असल्याची कडवट टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.
नाना पटोले म्हणाले, शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. वायकर प्रकरणावर फारसे बोलण्यात काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले तेव्हाच त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखे काही नाही, असे नाना पटोले म्हणाले.
पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे? महाराष्ट्र पोलीसच सुरक्षित नाहीत ही परिस्थीती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही. जेलमधील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते, ससून रुग्णालयात उपचाराच्यानावाखाली आरोपींना फाईव्हस्टार व्यवस्था दिली जाते. प्रशासन व पोलीस कुठे आहे हे कळत नाही.
नागपूरमध्येही राम झुलावर मद्यधुंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली, ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाब होता. त्यामुळे या आरोपींना लागलीच जामीन मिळाला. धनदांडग्या घरातील आरोपींना कसलीच भिती राहिली नाही म्हणूनच महिला पोलिसाला जाळण्याची हिम्मत होते असे पटोले म्हणाले.