मुंबई प्रतिनिधी , ५ जुलाई :
मुंबई राजरोसपणे लुटली जात असून दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा या महायुती सरकारने अदानीच्या घशात घातली आहे.त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा आणि या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची आग्रही मागणी गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहेत.अदानींना राज्याचे प्रमुखच पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोलही वडेट्टीवार यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत मुंबईतील जमिनी हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करत असताना सांगितले की, कुर्ला येथील दुग्धशाळेची जमीन साडे आठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ या एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली.हे हस्तांतरण एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी असा संतप्त सवालही त्यांनी केला.सदर जमिनीचे मूल्यांकन किती आहे ? जमिनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते ? किंमत वीस हजार कोटी रुपये होते, तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली यावर शंका उपस्थित करत या सर्व अकस्मात झालेल्या प्रक्रियेवर वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात आक्षेपही घेतला.
हस्तांतरणा संदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या.मुंडे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली का.. अशी कडक शब्दात विचारणा करत वडेट्टीवार यांनी हे अधिवेशन संपण्याच्या आत सभागृहाला याबाबतची माहिती देण्याचीही आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.