मुंबई, दि. १८ प्रतिनिधी :
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बाजी मारल्यानंतर ठाकरेसेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुंबईतील वर्चस्व कायम राखण्यासाठी ठाकरेसेना २५ जागांसाठी आग्रही आहे. लोकसभेला ठाकरेसेनेनं मुंबईतील ६ पैकी ३ जागा जिंकल्या. यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मुंबईत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी ठाकरेसेनेनं मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेनं १४ जागा जिंकल्या. पक्षफुटीनंतर ४० आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. पण मुंबईतील निम्म्याहून अधिक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. १४ पैकी ८ आमदार ठाकरेंसोबत कायम राहिले.
आता हीच संख्या दुप्पट करण्याचा प्लान ठाकरेसेनेनं आखला आहे. त्यासाठी विधानसभेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न ठाकरेंनी सुरु केला आहे. मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा येतात. गेल्या निवडणुकीत भाजप मुंबईतला सर्वात मोठा पक्ष ठरला. शहरात भाजपला १६ जागा मिळाल्या. तर शिवसेनेला १४ जागा मिळाल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर १४ पैकी ६ आमदार शिंदेंसोबत गेले. तर ८ आमदार ठाकरेंसोबत कायम राहिले. आता विधानसभेला काही महिन्यांचा कालावधी राहिला आहे. महायुती, महाविकास आघाडीत जागावाटपासाठी खलबतं सुरु आहेत.
मुंबईतील ३६ पैकी २५ जागा लढवण्यासाठी ठाकरेसेना आग्रही आहेत. यामध्ये शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, मानखुर्द शिवाजीनगर, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर या मतदारसंघांचा समावेश आहे.