मुंबई दि. २९ मे :
अंजली दमानिया या सुपारी घेऊन आमचे नेते अजितदादा पवार यांच्यामागे लागल्या असून त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे समजण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सरकारकडे पत्रकार परिषदेत केली.
पुणे कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजितदादा पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती यावर बोलताना उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली.
पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे यात वादच नाही. या घटनेने सर्वांचे मन हेलावून सोडले आहे. या घटनेची योग्य पध्दतीने कारवाई होताना आपण पहात आहोत. या घटनेतील अपराध्यांना मदत करणार्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणात मुलाला, वडिलांना आणि आजोबांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र याप्रकरणात जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करण्याचा उद्योग काही लोकांनी चालवला आहे अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी केली.
राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने अजितदादा पवार मंत्रालयात बैठक घेत होते तर काही लोक जम्मू – काश्मीरमध्ये श्रमपरिहार करण्यासाठी गेले आहेत. मतदान संपताच दुसर्या दिवशी अजितदादा पवार मंत्रालयात येऊन काम करत होते. मात्र अंजली दमानिया अजितदादा कामाचा आव आणतात असे बोलत आहेत. अहो, तुमच्यासारखा समाजसेवेचा आव आणत नाहीत. ३५ वर्षे झाली हा महाराष्ट्र पहातोय अजितदादा पवार सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या कामांसाठी उपलब्ध असतात म्हणूनच लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात. तुम्हाला कुणी निवडून दिले आहे का? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कधी निवडून आला आहात का? एखादी निवडणूक लढवून लोक किती तुमच्या पाठीशी आहेत हे तपासून का घेत नाही असे अनेक सवाल उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांना केले.
अजितदादा पवार यांच्यावर आरोप करणार्या अंजली दमानिया यांच्याकडे पुरावे आहेत का? पुण्याच्या कमिशनरला पालकमंत्री म्हणून त्यांनी विचारणा करायची नाही का? की अजितदादांनी अंजली दमानिया यांना विचारुन कॉल करायचा होता? तुमच्यासारख्या मिडियासॅव्ही असलेल्या व्यक्तीला ती गरज आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला मिडिया आहे की नाही याच्याशी घेणेदेणे नसते असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले.
अंजली दमानिया राज्यात ज्या अनेक घटना घडल्या त्या घटनांबद्दल खरंच संवेदनशील आहेत का? की फक्त पुणे घटनेवर त्यांनी कुणाची सुपारी घेतली आहे हे जाहीर करावे असे स्पष्ट आव्हान उमेश पाटील यांनी दिले.