पुणे , दि.२२ :
“भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही २०१४ ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जाते”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अमित शाह म्हणाले, जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या २४० जागा आल्यात, यांचे सर्वाच्या मिळून पण आल्या नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय. आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो. २०१४ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले. ६० वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे. काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले. संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जनमभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही. आम्ही मंदिर बनवून दाखवलं. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला.