मुंबई प्रतिनिधी , २६ जून :
काही महिन्यांपासून अधिक चर्चेत असलेले आणि सातत्याने पक्षाची भूमिका कठोरपणे मांडणारे शिंदेंचे अनेक शिलेदार हे मंत्रीपदाची आतुरतेने वाट बघत आहेत.गेल्या वर्षी प्रमाणे मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकसभेनंतर आता विधानसभेचं वेध सगळ्यांना लागले आहेत. विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपली असली तरी देखील अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र गेल्या अधिवेशनावेळी अनेकांनी आपली मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. लोकसभेत खासदारकीचे तिकीट मिळावं यासाठी शिंदेंच्या सेनेतील काही आमदार इच्छुक होते परंतु काही ठराविक आमदारांना लोकसभेत स्थान मिळाल्याने इच्छुक आमदारांची संधी हुकली त्यामुळे शिंदेंच्या सेनेत नाराजी नाट्य दिसून आलं. पण यातच काही महिन्यांपासून अधिक चर्चेत असलेले आणि सातत्याने पक्षाची भूमिका कठोरपणे मांडणारे शिंदेंचे अनेक शिलेदार हे मंत्रीपदाची आतुरतेने वाट बघत आहेत.गेल्या वर्षी अशामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा एकदा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामध्ये क्रमांक एक वर येतात ते शिंदेंचे कडवे समर्थक संजय शिरसाठ. जे संभाजीनगर मधून निवडून आले होते. सध्या संदिपान भुमरे हे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदावर आपलीच वर्णी लागेल अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर दुसरे रायगड जिल्ह्यातन भरत गोगावले हे देखील इच्छुक आहेत तशी इच्छा त्यांनी माध्यमांसमोर देखील अनेकदा बोलून दाखवली आहे. यांना देखील मंत्रिपदाने बऱ्याचदा हुलकावणी दिली होती ती सध्या पुन्हा हुलकावणी देते की मंत्रिपदरात पडते हे पाहणे देखील उत्सुकतेचे राहील. तिसरे नाव मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून प्रताप सरनाईक यांचे आहे. त्यांना देखील लोकसभेमध्ये उमेदवारी दिली जाणार अशी संभावना होती परंतु आता मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव देखील आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
आता या सर्वांमध्ये मंत्रिमंडळाचा खरंच विस्तार होतो का आणि शिंदेंसाठी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या शाब्दिक हल्ल्यांचे फळ यांच्या पदरात पडते का हे पाहणं औत्सुक्याचं राहील.